एकाभारतीय कुचकामी माणसाची गोष्ट
—राजेन्द्र पडतुरे—
Dilip Rajguru und seine Erstlingsnovelle
Das SPCollege aus Pune
या परते दुर्दैव काय असू शकते, की एक कतृत्ववान माणूस स्वतःला कुचकामी म्हणून हिणवून घेतो. राजगुरूंच्या आत्मकथनात्मक जर्मन कादंबरीचा नायक (खरंतर राजगुरूच) कुचकामी नाही.
इथे मी प्रा. दिलीप राजगुरू लिखित आत्मकथनात्मक जर्मन कादंबरी एका भारतीय कुचकामी माणसाची गोष्ट
बद्दल आज चर्चा करणार आहे. २५ जुलै १९४५ साली पुण्यात जन्मलेले दिलीप राजगुरू पुण्यातील सर परशुराम भाऊ महाविद्यालयात मनोभावे सेवा करून जर्मन भाषेचे प्राध्यापक आणि जर्मन विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. सदर कादंबरी वास्तविक पाहता राजगुरूंची आत्मकथनात्मक गोष्ट आहे. राजगुरूंनी या कादंबरीला दिलेलं शीर्षकच मुळी आक्षेपार्ह आहे. राजगुरूंनी या कथानकाच्या नायकाला सुहास हे नाव जरी दिलेलं असलं, तरी राजगुरूंना इतकी वर्षे ओळखणारा कोणीही माणूस या गोष्टीला ओळखून जाईल, की कथानक स्वतः राजगुरूंच्या जीवनावरच आधारित आहे.
मी १९७७ पासून दिलीप राजगुरूंना माझे जर्मन भाषेचे शिक्षक म्हणून ओळखतो. दिलीप राजगुरूंच्या भूरळ घालणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने आकर्षित व प्रभावित झालेला मी त्यांचा एकमेव विद्यार्थी नाही. राजगुरूंची विनोदबुध्दी व समयसूचक हजरजबाबीपणा कोणलाही सहज मोहून टाकतो. आपल्या एका विशिष्ट शैलीने वर्गात हसत खेळत
सहजरित्या व्याकरण असो किंवा एखादा क्लिष्ट साहित्य विषय असो, राजगुरू हाताळत असत. निस्वार्थी, कतृत्ववान मेहनती, आपल्या विषयाला सर्वस्व अर्पून शिकवण्याची राजगुरूंची सचोटी अतुलनीय आहे.
राजगुरूंच्या पहिल्या वहिल्या साहित्यकृती एका भारतीय कुचकामी माणसाची गोष्टी बद्दल बोलताना त्यांनी ह्या कृतीची जडण घडण कशी केली, वगैरे घटकांविषयी मी चर्चा करणार नाहीये. या कादंबरीचा नायक एक हरहुन्नरी, कर्तबगार आणि मेहनती तरूण सुहास, खरंतर हा नायक म्हणजे स्वतः राजगुरूच आहेत. पस्तीस वर्षे जर्मन भाषा इमाने इतबारे शिकवून सेवानिवृत्त झाल्यावर राजगुरूंनी ही आपली प्रथम साहित्यकृती लिहिली आहे.
या कादंबरीला डिर्क शोल्टेन–आकोनने लिहिलेल्या प्रस्तावनेत हा प्रश्न उपस्थित केला आहे, की राजगुरू ही एका कुचकामी माणसाची गोष्ट का म्हणतातॽ डिर्क शोल्टेन–आकोन या प्रश्नाचे उत्तर देतात, की आइशेनडोर्फ या जर्मन कादंबरीकाराची कादंबरी एका कुचकामी माणसाची गोष्ट वाचली की लक्षात येते की राजगुरू आपल्या कादंबरीच्या नायकाला कुचकामी का म्हणतात. आइशेनडोर्फच्या कुछकामी माणसाच्या बाबतीत करियर आणि अर्थार्जन हे विषय महत्वाचे नाहीत. त्याच्या रोमॅन्टिक संकल्पनेनुसार एक लायक नागरिक आपल्या संकुचित स्वरूपाच्या जीवन विषयक प्रेरणांवर मात करून जीवनाच्या उच्चमूल्य व उद्दिष्टांना प्राप्त कसा करतो, हे आइशेनडोर्फला दाखवायचे होते. हीच प्रेरणा आइशेनडोर्फचा नायक आणि राजगुरूंचा सुहास या दोन्ही व्यक्तींना एकत्र आणतात. (राजगुरूंच्या पुणे येथे जानेवारी २०२२ साली प्रकाशित कादंबरीतील प्रस्तावनेतून डिर्क शोल्टेन–आकोन यांचे वक्तव्य मी इथे मराठीत अनुवाद करून देत आहे.)
जोसेफ फोन आइशेनडोर्फची कादंबरिका एका कुचकामी माणसाची गोष्ट एका मस्त आणि स्वच्छंदी व्हायोलिन वादनाचा नाद असलेल्या माणसाची गोष्ट आहे, जो स्वच्छंदी, धाडसीपणे हिंडत असतो. आयुष्यात फक्त व्हायोलिन वाजवून उडाणटप्पूपणा करून पोट भरत नसतं, म्हणून आपल्या मुलाला जगाची ओळख व्हावी, या कारणाने मुलाला स्वतःच्या पायावर उभं रहायला शिकण्यासाठी
घराबाहेर काढलेलं असतं. हा तरूण आपल्या व्हायोलिनच्या धुंदीत बाहेर पडतो आणि स्वच्छंदीपणे हिंडफिरेपणा करता करता एका मुलीच्या प्रेमात पडतो. एकोणीसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या व्हिएन्ना शहरा जवळील एका राजवाड्यात व इटलीतील वेगवेगळ्या ठिकाणी हा स्वच्छंदी भटक्यावृत्तीच्या तरूणाची कथा आइशेनडोर्फ सादर करतो. हा इटली मधल्या नकारात्मक अनुभवानंतर व्हिएन्ना शहरात येतो. ह्या कुचकामी तरूणाला इटलीत नकारात्मक अनुभव आल्यानंतर तो व्हिएन्ना शहरात येऊन आपलं नशीब अजमावतो.
जोसेफ फोन आइशेनडोर्फची कादंबरिका आणि राजगुरूंची कादंबरिका यांचं तुलनात्मक वाचन केल्यावर एक प्रश्न सातत्याने जो सतावतो आहे, की राजगुरूंच्या कादंबरीचा नायक आणि मूळ जर्मन कादंबरीतील नायक यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. राजगुरूं सारख्या कतृत्ववान, ध्येयवादी जर्मन शिक्षकाने आपल्याला एक कुचकामी माणूस म्हणवून घेण्यासारखं साम्य आइशेनडोर्फच्या कादंबरीतील नायक आणि राजगुरूंचा सुहास या दोघांमध्ये कोठेही नसताना राजगुरू सुहास या व्यक्तिमत्वांमध्ये कोणतं साम्य कसं दाखवतातॽ माझ्या मते, राजगुरूंनी या कादंबरीला एका भारतीय कुचकामी माणसाची गोष्ट असे शीर्षक न देता एका होतकरू पेशेवर माणसाची कहाणी पेश करायला हवी होती. राजगुरूंची जीवन कहाणी एक आदर्श आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वेगवेगळे मार्ग शोधून एक यशस्वी जर्मन शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यावर राजगुरूंनी स्वतःला कुचकामी म्हणवून घेण्यामध्ये स्वतःची किंमत कमी करणे आहे. मला वैयक्तिकरित्या जे समजतं, की राजगुरूंना आयुष्यात कधी संशोधन कार्य करायला अनुकूल परिस्थिती मिळाली नाही; पण ते म्हणून काही कुचकामी ठरत नाहीत.
