–अंजली कुलकर्णी
दोन वर्षांच्या अंतरानंतर पूर्ण १० दिवस प्रत्यक्ष साजरा (ऑफलाईन) झालेला ह्यावर्षीचा गणेशोत्सव नुकताच संपन्न झाला.ह्यावर्षीच्या गणेशोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना होती “भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव.” ह्यावर्षीची सजावटही ह्याच मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित होती.महाराष्ट्र मंडळ नॉर्थ बेंगळूरूच्या सजावट टीमने मंडळाचे सभागृह गणरायाच्या स्वागतासाठी सुशोभित केले होते.
ह्यावर्षी सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष होणार असल्यामुळे सगळ्यांचा उत्साह वाढला होता…अगदी पावसाचाही!तोही सगळे दिवस उत्साहाने हजेरी लावत होता.पावसाच्या हजेरीमुळे दूर राहणारे काही प्रेक्षक गैरहजर राहिले / काहीना राहावे लागले.
ह्यावर्षीच्या कार्यक्रमांमध्ये कीर्तन, कथक आणि भरतनाट्यम नृत्य,नाटक, पोवाडा,मुलाखत अशी विविधता होती. सगळेच कार्यक्रम छान झाले. विविध गुणदर्शन स्पर्धेत भाग घेतलेल्या दोन्ही संघांचे सादरीकरण फारच छान झाले.आजी आजोबा क्लबने सादर केलेला नवरसावर आधारित कार्यक्रमही छान रंगला.
श्री.यजुर्वेन्द्र महाजन यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम मनाला चटका लावून गेला.अनाथ आणि अपंग मुलांसाठी करत असलेल्या त्यांच्या कार्याची माहिती प्रेक्षकांना मिळाली.त्यांना व त्यांच्या या महान कार्याला शतशः प्रणाम!
महाप्रसादासाठी जवळ जवळ 200 च्या आसपास लोकं आली होती.बरेच नवीन चेहरे ह्यावेळी बघायला मिळाले,बऱ्याच नवीन ओळखी झाल्या.
रविवारी दुपारी लहान मुलांसाठी काही स्पर्धा घेण्यात आल्या.त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला.मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी त्यांचा दिवस छान एन्जॉय केला.
अतिशय साध्या सोप्या शब्दात जीवनाचे मर्म उलगडून सांगणाऱ्या बहिणाबाईंच्या कविता! प्रा.माधुरी शानभाग यांनी तितक्याच सोप्या भाषेत
त्यांच्या कवितांचे रसग्रहण केले आणि परत एकदा बहिणाबाई आणि त्यांच्या कवितांचा मोठेपणा अधोरेखित झाला.
बाप्पाला निरोप देताना नेहमीच खूप वाईट वाटतं. जड अंतःकरणाने त्याला निरोप दिला मात्र पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आश्वासन घेऊनच.
