— राजेन्द्र पडतुरे —
मी प्रमुख संशोधन प्रकल्पांतर्गत समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक जर्मन भाषेत भाषांतरित करत आहे. या साठी मी जी प्रस्तावना लिहिली आहे, त्या मध्ये महाराष्ट्राचे महत्वाचे संतकवीं सम्बन्धी चर्चा आहे. त्या वरूनच मला ही लेखमाला लिहिण्याची कल्पना सुचली.
लेखमालेतील प्रथम पुष्प
भारतातील नैऋत्य दिशे मधील महाराष्ट्र राज्याला समृध्द संत परंपरेचा वारसा लाभला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी महाराष्ट्रात वारी परंपरेचा पाया घातला. त्यांनी आपल्या अजरामर व्दारा श्रीकृष्णाचे भगवद गीते मधील ज्ञान (मूळात संस्कृत मधून) सर्व सामान्य माणसा पर्यंत प्राकृतात पोहोचवले. तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज इत्यादी संतपुरूषांची नावे या संतांमध्ये समाविष्ट करता येतील. तुकारामांची गाथा, एकनाथी भागवत, नामदेवांचे अभंग इत्यादींचा समावेष संत साहित्य परंपरेत करता येईल. ज्या संत महंतांनी भक्ती मार्गाव्दारे जनसामान्यांना मोक्षाचा मार्ग सुचवला, असे महत्वाचे भक्तीमार्गी संत म्हणून श्री नामदेव महाराज (१२७० ते १३५०), संत श्री ज्ञानेश्वर महाराज (१२७५ ते १२९६), संत तुकाराम महाराज (१६०८ ते १६४८), संत रामदास महाराज (१६०८ ते १६८१), बहिणाबाई (१६२८ ते १७००) यांचा उल्लेख केला जातो.
संत नामदेव महाराज
१२७० ते १३५०
हिंदू वारकरी सम्प्रदायाचे एक महत्वाचे भारताच्या मध्ययुगातले म्हणून संत नामदेवांचा उल्लेख होतो. शीख धर्माचे अनुयायीही नामदेवांचे भक्त होते. नामदेवांच्या मते मुलाबाळांच्या संसारात राहून ही पुरूष मोक्षपदाला पोहोचू शकतात. नामदेव स्वतःला कधीही श्री कृष्णाचे भक्त किंवा सेवक समजत नसत. कृष्ण हा त्यांचा सखा होता. त्यांचा पूर्ण परिवार वारकरी सम्प्रदायी होता आणि ते नियमितपणे वारीला जात असत. कृष्णा नदीच्या तीरावरील नर्सिबामानी, कऱ्हाडच्या नजीक सातारा जिल्हयाचे रहिवासी. त्यांचे वडील एक शिंपी होते आणि विठ्ठल भक्तीत रममाण होते. नामदेवाच्या जन्माच्या दोन वर्षे अगोदर ते पंढरपूरला स्थायिक झाले. नामदेवाबद्दल असं सांगितलं जातं, की फक्त दोन वर्षाचा असताना नामदेव पूर्ण शब्द बोलत असे आणि पहिला शब्द नामदेवाच्या बालमुखातून बाहेर पडला तो विठ्ठल होता. सात वर्षीय नामदेवानी चिपळ्या बनवल्या होत्या.
तासनतास नामदेव भजन किर्तनात रंगून जात असे. एकदा नामदेवाला त्याच्या आईनी देवळात देवाला नैवेद्य दाखवायला सांगितले असतानाची प्रसिध्द आख्यायिका सगळ्यांना माहीती आहेच. देवा पुढे नैवेद्य ठेवून बराच वेळ झाल्यावर देव जेवत नाही, पाहून निरागस नामदेवानी विठ्ठलाशी भांडायला सुरूवात केली. तरीही देव जेवण करत नाही, हे पाहून नामदेव धाय मोकलून रडू लागला. मग मात्र देवाला त्या अजाण बालकाची कीव आली आणि देव सगुण रूपात प्रकट होऊन नामदेवाचा नैवेद्य खाऊन गेले. नामदेवाच्या खुशीला पारावार उरला नाही. धावत घरी जाऊन आपल्या आईला सर्व वृत्तांत सांगितला. दुसऱ्या दिवशी आईने नामदेवाला परत नैवेद्य वाढून दिला आणि त्याच्या पाठोपाठ त्याच्या नकळत देवळात जाऊन पाहते, तर देव खरोखरच सगुण रूपात प्रकट होऊन नैवेद्य खाताहेत, हे पाहून ती माऊली धन्य झाली. देवा पुढे पदर पसरून तिला नामदेवा सारखा गुणी मुलगा दिल्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानले.
