–पंकज पंडित
“अरे हा मेसेज बघ …आपले महाराष्ट्र मंडळ , लेखन स्पर्धा आयोजित करतायतू!. तू जरूर भाग घे ” गेल्या नोव्हेंबर’ मध्ये , सौ. मंजिरी, माझ्या बायकोने सुचविले . “खरेच मराठीतून लिहायला खूपच मजा येईल” असा विचार करून मी नाव स्पर्धेत नोंदवले.” २००३ मध्ये मुंबई सोडून, बंगलोरला आल्यानंतर , मी इंग्रजीतून, पर्यावरण, आरोग्य, आर्थिक गुंतवणूक , विमान उद्योग अशा विषयांवर वैचारिक स्वरूपाचे लिखाण केलं होते.
“कावळ्याच्या शापाने “ दमदार” सुरवात! : माझी स्पर्धेला, सुरवात झाली , कोणाच्या “आशिर्वादाने नाही तर कावळ्याच्या” शापाने” ! पुढे माझ्या आयुष्यात घडलेल्या सकारात्मक आणि सत्यघटनांना उजाळा देण्याच्या उद्देशाने , “इच्छापूर्ती” , “हसा आणि लठ्ठ व्हा”, हा विनोदी अंगाने लिहिलेला (“अंग कमी” करण्यासंबंधी!!) शास्त्रीय लेख , अशा ऐच्छिक विषयांवर मी लिहिले
एप्रिलसाठी स्पर्धेत अधुरी कहाणी पूर्ण करण्याचे आव्हान ललित-लेखन करणे सोडा, वयात आल्यावर, मी कथा, कादंबरी असे ललित-वाचनसुद्धा फारसे केले नव्हते (कवितावाचन मात्र याला अपवाद)
माझी ठाम समजूत होती की , “प्रत्येक लहान-मोठ्या, लेखकाची एक शैली असते” ; हाताच्या ठश्यासारखी,सही सारखी; प्रत्येकाची शैली वेगळी, तरी अव्दितीय (unique) असते. अपवाद वगळता आपल्याला गवसलेली हातखंडा शैली, कोणी लेखक (चित्रकार, गायक, अभिनेतेसुद्धा) सहसा सोडत नाहीत उदाहरणार्थ “रिपोर्ताज शैली” ज्यासाठी कै. अनिल अवचट, ओळखले जात असत वैचारिक पिंड, चेहेरा- मोहरा असलेला लेखक जर एखादी कथा, कादंबरी, कविता या “बाजाने” लिहू लागला तर ? तर असा प्रयत्न “अहेतुपूर्वक” हास्यास्पद ठरू शकेल ! “भाकड कथा” लिहून मी माझं “हस” करून घेईन; स्पर्धेतून “यशस्वी माघार” घ्यावी अस वाटले.!
“आलिया भोगासी असावे सादर” : “बघू पुढे काय होईल ते ! अशी मनाची समजूत घातली. परंतु “सत्य हे कोणत्याही ललित कथेपेक्षा जास्त नाट्यमय असते” पुढील दोन आठवड्यात माझ्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची पुसटशीपण कल्पना मला नव्हती
खारघरच्या “सौख्य” या आमच्या राहत्या घरी,पहाटे रविवार, ६ मार्च, २०२२ रोजी, माझी पत्नी,सौ.मंजिरी हीचे अकस्मात निधन झाले; अंडकोषाच्या कॅन्सरचे (ovarian cancer) रोग-निदान झाल्याच्या, अवघ्या दहा दिवसात ! माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला .! गृह”सौख्य”च हरपले! होळीच्या दिवशी बायकोचे श्राद्ध करून, मी स्वतःला सावरले.
दुःखाचे धुमसते निखारे गुलाम अली यांची एक गझल आहे..,,, माझं स्वैर भाषांतर
महिन्याभर क्षणभरसुद्धा स्पर्धेचा विचार मनात नव्हता. “आयुष्यातील घडून गेलेल्या बऱ्या-वाईट घटनाबद्द्दल “अनिवार्य स्वीकृती” च्याही पुढे जाऊन “अनिवार्य निवड” (choiceless selection) करायची”; असे “इच्छापूर्ती” ही माझी गेल्याच महिन्यातील लघुकथा सांगत होती. म्हणून स्पर्धेचा विचार करू लागलो. आणि काय आश्चर्य! “अधुऱ्या कहाणीचा” कुट-प्रश्न, लेखन-तिढा (writer’s block) सहज सुटला!
” सामान्यतः “दुःखाचे भांडवल हा शब्द चांगल्या अर्थाने वापरात नाहीत पण या ठसठसणाऱ्या दुःखाचे “भांडवल” वापरून, अपुरी कहाणी पूर्ण करायला मला चंद्रबळ मिळाले; कथा सूत्र सापडले! एप्रिल २२ या महिन्याच्या “सनविवि”मध्ये माझे दोन लेख प्रसिद्ध झाले, एक होता अंकाच्या पूर्वार्धात, बायकोवरील मृत्यू-लेख
आणि दुसरी होती शोकांतिका “अखेरचा दंडवत”, माझ्या बायकोच्या पूर्वायुष्यावर बेतलेली ; अर्थात सत्य आणि कल्पना यांचे, बेमालूम मिश्रण करून!. याच “भळभळत्या दुःखाचे भांडवल” मला पुढील महिन्यातील कविता करण्यासाठी सुद्धा पुरले !
“खेळ चालला नित्य निरंतर, परी खेळिया अदृश्य दिगंतर” माझ्या मे महिन्यात पाठविलेल्या, “या विश्वाचे, मी आवर्तन” निसर्ग-कवितेतील शेवटची ओळ. खरे तर अशी आशयगर्भ गंभीर कविता, शोकात्म कथा , माझ्या आनंदी (happy go lucky ) स्वभावाच्या अगदी विपरीत , परंतु माझ्या हातून घडल्या, याला कारण स्मशान-वैराग्य ! या माझ्या आयुष्यतील या पहिल्या-वाहिल्या कथा , कविता होय! कला जीवनाचे अनुकरण करते की जीवन कलेचे ? ( Life imitates art ?)
हृदयस्पर्शी, आशयगर्भ वाङ्ग्मय वेदनेपोटीच जन्म घेते. दुःख-वेदना माणसाला अधिक खोलवर, अस्तित्वाच्या डोहाच्या तळाशी , जीवनाच्या मूळ प्रेरणेपाशी नेते याउलट सुख, खळाळत्या पाण्यासारखे उथळ असते . म्हणूनच कुंतीने श्रीकृष्णाकडे “दुःख” मागितले असावे .
वळण वळणाचा “घाट रस्ता संपला” हे वाचून चालकाचा जीव भांड्यात पडतो! तसेच मला वाटले जेव्हा, लेखन-स्पर्धा, कथा, कवितांचा “दुस्तर प्रांत” ओलांडून, पुन्हा विनोद, प्रवास–वर्णन वैचारिक लेख,अशा “सपाट रस्तयावर” आली. योगायोगाने, तोपर्यंत माझ्या दुःखाची झळ कमी झाली होती!
टिप१
स्पर्धा एक बौद्धिक विरंगुळा स्वतःला, काही ना काही, व्यापात व्यग्र ठेवणे हा दुःखावर सर्वात उत्तम उपाय असतो. स्पर्धेसाठी लिहिणे हा माझा बौद्धिक विरंगुळा झाला., तेढ पसरवणारे विखारी संदेश, राजकरणाविषयी वितंडवाद माजवणाया व्हाट्सएप्प ग्रुप्समधून, मी “एक्सिट” घेतली माझ्या हळव्या मनाला कोलाहल, कलकलाट सहन होईनासा झाला. नकारात्मक लोकांना, जुने मित्र वा नातेवाईक असले तरी, “covid” झाल्यासारखे, सोशल मीडियात, दहा हात दूर ठेवले. लेखनावर एकतानतेने लक्ष्य केंद्रित केले.
प्रौढत्वी नीज शैशवास जपणे आणि ज्या गोष्टीला आधी, माझा विरोध होता (“रविकीरण मंडळ” फेम-“दिलेल्या विषयावर लिहिणे”!) हे आता आवडू लागले! शाळेत कसं बरं वाटायचे? अगदी तसे! रोज, स्वच्छ युनिफॉर्म (धुपका , बिना इस्त्रीचा!) फक्त अंगावर चढवायचा ! याउलट कॉलेजात , “आज काय कपडे घालायचे” (जसे आता कोणत्या विषयावर लिहू ?) हा यक्ष-प्रश्न रोज “आ वासून” उभा राहत असे !
आभासी वर्गातील स्पर्धा संपल्याची हुरहूर ! शालेय परीक्षेत प्रश्न-पत्रिका वाटल्यानंतर, वर्गात पसरायची तशीच बोचरी, चिडीचुप्प, “सक्तीची शांतता”, पुढचा विषय जाहीर झाला की आभासी ग्रुपवर असायची ! (Only “Admin” can send messages!) पहिल्या बाकावर बसणाऱ्या मुलांसारखे गृहपाठ , म्हणजे दिलेल्या विषयावरील लेख, काही, वेळेच्या आधीच पाठवायचे , तर काही, शेवटच्या बाकावरील मुलांसारखे , अगदी शेवटच्या क्षणी ! तुरळक शंका, बहुतेक सर्व “व्रतस्थ-मौनी”! शाळेत काही काळ एका बाकावर बसून आपण गप्पा टप्पा करतो आणि निरोप समारंभानंतर, दहा दिशांना पांगतो!… आताही तेव्हा प्रमाणे, डोळ्यांच्या कडा पाणावतील!
कलाकार आणि कलाकृती भिन्न आहेत उच्च दर्जाची कला-निर्मिती, जन्म देणार्या कलाकारापेक्षा अधिक काळ जिवंत राहते आज जगात अस्तित्वात असलेल्या अभिजात साहित्य, कलाकृती, शास्त्रीय शोध यांचा निर्माता कोण? हे कधीच पुसले गेले आहे..“निर्मिती” कोणाच्या तरी, प्रतिभेच्या तर्फे वास्तवात अवतरते !. म्हणूनच नवनिर्मिती कधीच थकत नाही, निर्माता थकला तरीही, कारण “निर्मितीमागचा “खेळिया” अदृश्य आहे
कलाकार केवळ निमित्त मात्र : वरवर पाहता, कलाकार हाच कलाकृतीला (ललित कथा, कविता, चित्र, शिल्प,संगीत इ) जन्म देणारा असे वाटते. मात्र उत्तम अभिजात कलाकृती “अनामिक” कलाकारातर्फे प्रकट होते कलाकाराला वाटते, मी निर्मिती केली ते खरे नाही अज्ञाताच्या भूमीवरून काही साद, कधीतरी ऐकू येतो , तो तरल क्षण टिपला तर मग निर्मिती –प्रक्रिया सहज सुकर होते, विनासायास !
साहित्यउन्मेष स्पर्धेने हेच बिंबिविले
- ”कलाकाराची शैली, निव्वळ एक मुखवटा, मनाचा साचा , जसे सवयीचे कपडे , ज्यात बरं वाटते” मनाच्या पलीकडे झेप घेऊनच, अभिजात निर्मिती होत असते ; जर मनाची कवाडे उघडी असतील तर… तर मग अवचित, प्रतिभेच्या वाऱ्याची झुळूक येते ! (अवचिता परिमळू — इति ज्ञानेश्वर)
- “सशक्त” “कथा-बीजापोटी”, फळे येणारच “रसाळ, गोमटी ! टिप २
- नव उन्मेषाने अदृश्य सूत्रधार, बहुरुपिया, वेगवेगळ्या रूपाने, निर्मिती करीत राहणार !
आपल्या हाती एव्हढच आहे, खेळ चालुद्या नित्य निरंतर” The show must go on .. —————————————————————————————————- –email panditpank@gmail.com टिप१ (डॉ सुमन नवलकर यांची कविता यांनी कविता उद्धृत करण्यास परवानगी दिली आहे. टिप२ शुद्ध बीजापोटी , फळे रसाळ गोमटी (संत तुकाराम)
