–माणिक
“उद्या बिट्टूच्या शाळेत
स्नेह–संमेलन आणि बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आहे आणि आपल्याला “विशेष निमंत्रण” आहे, लक्षात आहे ना राज?”
“अं ? हो तर— ते कसं विसरेन मी?”— शर्टच्या टायला गाठ बांधता बांधता राजीव म्हणाला.”बाय द वे, आहेत कुठे महाशय? आणि छकुली?” “छकुलीला घेऊन सोसायटीच्या गार्डनमध्ये गेलाय खेळायला–” “अरे वा! छान. चल, मी निघतो आता—” राजीव गेला आणि रेवती मुलांना बोलवायला बागेत गेली. बिट्टू म्हणजे मेघ,बारा वर्षाचा आणि छकुली म्हणजे मुक्ता, तीन वर्षाची. घरात वृद्ध सासू–सासरे— त्यांची नीट काळजी घेता यावी आणि मुलांकडेही दुर्लक्ष होऊ नये म्हणून रेवतीने मिळत असलेला चांगला जॉब नाकारला. आणि ह्या एकाच गोष्टीसाठी राजीव आणि आई–बाबा दोघेही तिचे मनापासून आभारी होते. अर्थात, राजीव स्वतः एक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी होता, त्यामुळे तिला नोकरी करायची तशी गरजही नव्हती; पण इतकं शिकून आणि आवड असूनही तिने स्वेच्छेने हे पूर्णवेळ गृहिणीपद स्वीकारलं होतं.राजीवला आज जवळच्या तालुक्याला भेट द्यायला जायचे होते. गाडीत बसल्या बसल्या त्याने आजच्या कार्यक्रमांची मनातल्या मनात उजळणी करून घेतली. “उद्या सकाळी कुठली महत्वाची मीटिंग आहे का संजय?” ” नाही सर. सकाळी नाही ; पण दुपारी चार वाजता मात्र खासदार पाटील आणि गावातील व्यापारी वर्गासोबत मीटिंग आहे सर.” सेक्रेटरी संजयने तत्परतेने माहिती पुरवली. “थँक गॉड! आणि असती तरी आपल्याला ती पुढे ढकलावी लागली असती.” ” सर, माफ करा; पण काही खास— काही खासगी?” “छे: रे. खासगी नाही पण खूप महत्वाचे आहे. आपल्या बिट्टू च्या शाळेत कार्यक्रम आहे उद्या. संजय, प्लीज, मला रिमाईंड करशील—” “ओह! शुअर सर–!” आणि राजीव चार वर्ष मागे गेला. त्या सुखद आठवणीने त्याच्या चेहऱ्यावर एक हलकेच स्मित झळकले. चार वर्षांपूर्वी असाच तो एका तालुक्याच्या ठिकाणी गेला होता, एका अनाथाश्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्याला बोलावले होते. तेव्हा नुकतीच अकोला जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून त्याची नियुक्ती झाली होती. तेल्हारा येथील “गुरुकुल बालक आश्रमात” त्याला बक्षीस समारंभ आणि आश्रमाच्या नवीन शाखेच्या उदघाटनासाठी विशेष निमंत्रण ” होते.आश्रमातील मुलांच्या अगोदर वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या नी नंतर बक्षीस समारंभाला सुरुवात झाली. “आणि विजेता आहे—– मेघ—– ” टाळ्यांच्या कडकडाटात साधारण आठ एक वर्षाचा गोड मुलगा बक्षीस स्वीकारण्यासाठी स्टेजवर आला. आपल्याला एका मोठ्या अधिकारी व्यक्तीच्या हातून बक्षीस मिळतंय,हे त्या छोट्याशा जिवाला कळलं होतं आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दाटून आलेली दिसली राजीवला. का कुणास ठाऊक; पण त्याला बघताक्षणी मनात कुठेतरी कालवा कालव झाली.इतिहासाची पुनरावृत्ती होत होती. त्याने अतिशय प्रेमाने मेघच्या केसांवरून आपला हात फिरवला. नंतरची अजून बरीच बक्षिसे मेघच्याच नावावर घोषित केली गेली आणि प्रत्येकवेळी कलेक्टर साहेबांकडून कौतुक करून घेतांना तो तितकाच उल्हसित होत होता. त्या दिवशीचे सगळे कार्यक्रम अटेंड करून झाल्यावरही राजीवच्या डोळ्यासमोरून मेघ काही केल्या हटायला तयार होईना. रात्री जेवतांना त्याने ते रेवतीपाशी बोलूनही दाखवले. “राज, नेमकं काय घोळतंय मनात? तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल,ह्याची खात्री बाळग.”
” रेवा, इतकी कशी ग तू मनकवडी? बरोब्बर ओळ्खतेस माझ्या मनातलं—नेहमीच—” आणि त्याच्या स्नेहभरल्या नजरेनेच रेवती मोहरून गेली.
” आई बाबांच्या कानावर टाकूया अगोदर—-“
“ते विरोध करणारच नाहीत राज,उलट त्यांना अभिमानच वाटेल तुझा.” “आणि तुला?” राजने अशा काही खट्याळपणे पाहिलं की रेवती लाजून किचनमध्येच पळाली.
आणि मेघचे राज–रेवतीच्या आयुष्यात पदार्पण झाले, “बिट्टू” ह्या लाडिक नामांतरासह. बिट्टू चा गृह–प्रवेश अगदी साग्रसंगीत आणि धुमधडाक्यात पार पडला. कल्पनेपेक्षाही बिट्टू ह्या नवीन घरात छान रुळत गेला. आजी आजोबांच्या प्रेमळ छत्र छायेखाली, एक आई बापाच्या मायेसाठी आसुसलेला जीव, दुधात साखर विरघळावी तसा विरघळत गेला. तो घरात आल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात रेवतीला “बाळाची चाहूल” लागली—मग काय—आनंदी–आनंद आणि बिट्टूच्या कौतुकात अजूनच भर.
त्याच बिट्टूच्या कौतुक सोहळ्यात उद्या सामील व्हायचे होते, राजीवच्या पूर्ण कुटुंबाला.
आजी–आजोबा छकुलीला तयार करण्यात गढून गेले होते. रेवती देखील “कलेक्टर” च्या पत्नीला साजेशी तयार झाली होती.
“चला, निघुया ?” राजीवने विचारलं आणि सगळी पलटण निघाली बिट्टूच्या शाळेकडे.”बाबा, दादालाच सगळी बक्षीसे मिळणार आज—खरं ना?”
“हो ग राणी. तुझा दादा आज शाळेत हिरोसारखा चमकणार बघ—“
“अगदी तुमच्या बापासारखा—” आजी हळूच पुटपुटली.
आणि बक्षीस समारंभ सुरू झाल्यापासून खरोखर बिट्टूच्या नावाचाच पुकारा होत राहिला—“वादविवाद स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, क्रीडा स्पर्धा—कितीतरी बक्षिसे एकट्या बिट्टूच्या नावावर जमा होताना बघून रेवती–राजीव भरून पावले. त्याला बक्षीस त्याच्या बाबांच्या हातून देण्याची घोषणा झाली तेव्हा राजीवने आपल्या आई–बाबांना पुढे केले. नातवाचे कौतुक करतांना त्या वृद्ध जिवांना गदगदून आले. शब्दही न बोलता त्यांनी फक्त मायेने त्याच्या कुरळ्या जावळावरून हात फिरवला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजीवला दोन शब्द बोलण्याची विनंती केली गेली. अतिशय नम्रपणे सर्वांना अभिवादन करून राजीवने बोलायला सुरुवात केली.
” आपल्या मुलांचं आपल्या डोळ्यादेखत कौतुक होत असलेले पाहून कुणाला आनंद होणार नाही? मलाही आज खूप आनंद होतोय आणि अभिमानदेखील वाटतोय. मेघ ह्या शाळेचा “सर्वात ब्राईट स्टुडंट ” आहे, हे ऐकून तर आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते आहे. पण खरं सांगू, मेघच्या यशाचे श्रेय जसे त्याच्या उपजत बुद्धिमत्तेला जाते, त्याहीपेक्षा ते माझ्या आई–बाबांना देखील जाते. मेघ हा आमचा दत्तक घेतलेला मुलगा आहे,हे सगळ्यांना,इतकंच काय मेघलाही माहीत आहे. आणि त्याला दत्तक घेण्याची प्रेरणा मला कुणाकडून मिळाली असेल तर ह्या माझ्या आई बाबांकडून—- हो, मी देखील मेघसारखाच एक अनाथ मुलगा— एका माऊलीने “टाकून” दिलेला आणि दुसऱ्या माऊलीने “उचलून घेतलेला“— . टाकून देणाऱ्या हातांपेक्षा उचलून घेणारे हात कधीही श्रेष्ठ च नाहीत का? आज मी जो काही आहे,तो निव्वळ माझ्या“ह्या ” आई –बाबांमुळे. त्यांनी मला “आपलं” मानलं आणि माझं आयुष्यच बदलून गेलं.आजची माझी ओळख त्यांच्यामुळेच आहे. त्यांनी मला कधीही “पोरकेपणाची आणि परकेपणाची” जाणीव होऊ दिली नाही. माझी जन्मदात्री कदाचित “लाचार,अगतिक” असू शकते; पण बालपण तर लाचार नसतं ना? आणि ते नसावं. एक हक्काचं घर मिळणं हा प्रत्येक बालकाचा हक्कच आहे. त्यांचं निरागसत्व हिसकावून घेण्याचा कुणालाही काहीही अधिकार नाही.बालपण कोमेजता कामा नये. अनाथ हा शिक्का कपाळी बसणं हा काही त्यांचा दोष नाही. त्यांना “आश्रय” नको असतो फक्त,तर हवी असतात हक्काची माणसं, हक्काची माया–ममतेची जागा. आज जर प्रत्येक “सक्षम” कुटुंबाने एक अनाथ बालक दत्तक घेतलं, त्याला त्याच्या हक्काचं घर देऊ केलं तर,मला नाही वाटत,जगात “अनाथ” म्हणून कुणाच्याही वाटेला उपेक्षित जगणे येईल. आज मी अजून एक घोषणा करू इच्छितो— ज्या मातांना, भले नाईलाजाने का असेना, आपल्या बाळाचा त्याग करावा लागला असेल, आणि त्यांना कधीकाळी “आश्रयाची” गरज भासलीच तर त्यांच्यासाठी एखादा आश्रम स्थापन करावा—-जिथे अनाथ बालकांना “आई” मिळू शकेल आणि असहाय्य असलेल्या मातांना— बाळांचे प्रेम. मातृत्वाची आणि वात्सल्याची तहान एकाच ठिकाणी भागवली जाईल अशी जागा मला निर्माण करायची आहे. आणि अशा जागेचे उदघाटन “अशाच” एखाद्या मातेच्या हातून व्हावे,अशी माझी प्रामाणिक इच्छा राहील. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि परमेश्वर कृपेने ती इच्छा देखील लवकरच पूर्ण व्हावी—-” टाळ्यांच्या जोरदार कडकडाटात
भाषण संपले. राजीव समाधानी मुद्रेने खाली बसला; पण त्याचवेळी “एक असहाय्य माता” शाळेच्या आवाराबाहेर एका कोपऱ्यात बसून आसवांना वाट मोकळी करून देत होती—.
