माणिक
मानसशास्त्रात असं म्हटलं जातं की “children are known to cross boundaries”– मुलांना, विशेषतः लहान मुलांना मर्यादेच्या कक्षा ओलांडण्यातच मजा येते.
पालक आणि पाल्य ह्यांच्यातील नातेसंबंध कसे असावेत ह्याविषयी काही अधोरेखित नियम नाहीत; पण हे संबंध नाजूकपणे आणि सजग राहून हाताळावे लागतात, हे नक्की.
पालक आणि पाल्य ह्यांच्यातील संबंध “शिस्तबद्ध मैत्रीचे” असावेत. पालकांचा आदरयुक्त,प्रेमयुक्त धाक मुलांना वाटणे केव्हाही चांगलेच. हा प्रवास खरं तर मुलांच्या बालपणापासूनच सुरू होतो. हा प्रवास,तेव्हाच सुखकर आणि उत्तम होईल जेव्हा मैत्री आणि शिस्तीत समतोल राखत पालक जोडीने हातात हात घालून चालतील. हल्ली अपत्याकडे अधिकाधिक लक्ष देण्याची मानसिकता झाली आहे. त्याचं कारण एकुलते एक अपत्य. (बहुतेक घरात)आणि उशिरा आलेलं पालकत्व हे असू शकतं. अगदी लहानपणापासूनच अपत्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित झालेले असते आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्या (शक्यतोवर) मनाप्रमाणे केली जाते. त्यामुळे मुलांना नकार ऐकायची सवयच रहात नाही. मुलं हट्टी आणि आत्मकेंद्रित होत जातात.त्यात हल्ली “चौकोनी कुटुंब “पद्धतीमुळे घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा कळत नकळत असणारा धाक आणि त्याचवेळी त्यांच्याकडून लाभणारा आत्यंतिक जिव्हाळा, माया ह्या गोष्टींचा अभाव ह्याचाही परिणाम मुलांच्या वागण्या–बोलण्यावर होतच असतो.आज एकीकडे मुलांचे लाड पुरवताना दुसरीकडे मात्र—त्यांची अति काळजी करण्याच्या प्रयत्नात बंधने घातली जातात. मातीत खेळू नका, उड्या मारू नका, ह्याला हात लावू नका, रस्त्यावर धावू नका—-वगैरे— . मुलांना मातीत, चिखलात खेळू दिले तर त्यांची प्रतिकारशक्ती वाढते, असे संशोधकांचे मत आहे. “अलेसिया फ्रँको” आणि “डेव्हिड rabson” ह्या संशोधकांच्या मते, मुलांना नैसर्गिक वातावरणात मुक्तपणे बागडू दिल्याने त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संवेदना विकसित होतात. निसर्गाच्या सान्निध्यात बालपण गेलं तर तरुणपण हे अधिक सक्षम, सुदृढ बनू शकते. लहान मुलांच्या झोपेलाही प्राधान्य दयावे लागते. कारण लहान मुले प्रचंड दगदग करत असतात म्हणून दमतातही. पण बालवयात त्यांच्यावर शिस्तीच्या नावाखाली अभ्यासाचे आणि अपेक्षांचे जे अवाजवी ओझे लादले जाते, त्यामुळे मुले आतल्याआत घुसमटून जातात.पालकांचे जाचक वेळापत्रक त्यांची सर्वांगीण वाढ रोखण्यास कारणीभूत होते.पिंजऱ्यात दीर्घकाळ अडकलेल्या पक्ष्याला पिंजरा उघडताच उडता येत नाही. कारण पंखच कमजोर झालेले असतात.तद्वतच मुलांचे “विझत” जाणे पालकांच्याही मनावर आघात करू शकते. “अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रीशियन्स“च्या शिफारशीनुसार तर दोन वर्षापर्यंतच्या मुलांना स्क्रीन दाखवणेही योग्यच नाही. लहान मूल हे स्क्रीनशी नाही तर जवळच्या व्यक्तींशी संवाद साधायचा प्रयत्न करत असते. (आजकाल तर मुलांच्या हातात किंवा डोळ्यासमोर मोबाईल असल्याशिवाय ती जेवतच नाहीत, असा नवीन ट्रेंड झालाय)
किशोरवयीन मुलांशी वागता–बोलतांना शिस्तीपेक्षाही सामंजस्याने घ्यावे लागते. कारण मुले वयाच्या नाजूक वळणावर असतात—-त्यांच्याशी योग्य वेळी योग्य रितीने संवाद(सुसंवाद) साधणे महत्वाचे असते. त्यांचे विचार ऐकून त्यांच्या मतांचा आदर करणे गरजेचे असते. त्यासाठी घरातील वातावरण आणि आई—वडिलांमधील संबंध खूप परिणामकारक ठरतात. आई—बाबांनी देखील “टीम वर्क” म्हणून काम करावे लागते.(together each acchives more). त्यांच्यातील भांडणे, घटस्फोट, नकारात्मक दृष्टीकोन—ह्या सगळ्याचा परिणाम मुलांच्या मनावर होतच असतो. जाणत्या वयातील मुलांवर त्यांच्याही नकळत बारीक लक्ष ठेवावं लागतं. त्यांचा मित्र परिवार कसा आहे, ते मोबाईलवर काय बघतात,कुठल्या गोष्टींना प्राधान्य देतात—- हे बघणे पालकांचेच काम आहे. पबजी खेळता खेळता जीव गमावून बसलेले, नको त्या वयात नको त्या गोष्टींच्या आहारी गेल्याने झालेले वा ओढवलेले अपघात—अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला माहीत आहेत. त्यासाठी मुलांना योग्य त्या वयात घरातूनच लैंगिक शिक्षणाचे धडेही मिळायला हवेत.पालकांमधील वाढत्या घटस्फोटांचे प्रमाण, एकल पालकत्व, विवाहबाह्य संबंध आणि सोशल मीडियावरील नको त्या गोष्टींचा प्रभाव आणि परिणामी मुलांना न कळत्या वयात येणारे प्रौढपण ही फार गंभीर समस्या होऊन बसलीये. पालकांनी रागावले म्हणून किंवा हात उचलला म्हणून लागलीच आत्महत्येचा मार्ग स्वीकारणाऱ्या मुलांकडे बघितलं किंवा मनाजोगे न घडल्याने क्षणाचाही विचार न करता जीवन संपवणाऱ्या कोवळ्या जीवांकडे बघितलं तर मन उद्विग्न होतं.
मुलांना योग्य त्या वयात वाचन—संस्कार देणे किती आवश्यक आहे, हे लक्ष्यात घ्यायला हवे . वाचन बुद्धीला चालना देते, शब्दसंपत्ती,संवाद–कौशल्य विकसित करते. तरुण वयात करियर मधली चढाओढ, वाढती स्पर्धा, सतत खुणावणारी उच्च राहणीमान शैली—- ह्या सगळ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक असलेला संयम अंगी बाळगणं, स्व–कौशल्यावर विश्वास असणं आणि त्यासाठी सारासार विवेकबुद्धी जागृत ठेवणं—ह्यासाठी मुलं काय वाचतात, काय बघतात आणि नेमकं काय ग्रहण करतात हे पालकांनी जाणून घेणं गरजेचं आहे.आणि त्यासाठी आवश्यकतेनुसार “समुपदेशन” घेणं आणि देणं दोन्हीही करायची तयारी असणारी मानसिकता हवी. पालक हे आपल्या पाल्यांसाठी सर्वात “उत्तम समुपदेशक” ठरू शकतात.
मुलांसोबत आजच्या भाषेत “क्वालिटी टाईम स्पेन्ट” करणे ही काळाची गरज बनलीये.
याठिकाणी सहज आठवलं म्हणून एक उदाहरण देऊ इच्छिते— ऑस्ट्रेलियातील 43 वर्षाची माता आपल्या 26 वर्षाच्या दिव्यांग मुलाला पाठीवर घेऊन अर्ध्या जगाची सफर घडवते, त्याठिकाणी माणूस निःशब्द होतो. असो.
हल्ली काळानुसार, परिस्थिती नुसार आणि व्यक्तीपरत्वे सगळेच संदर्भ बदलताहेत. बहुतेक ठिकाणी पालक आणि पाल्य ह्यांच्यातील नातं अधिक घट्ट होतांना दिसतंय—त्यांच्यात मोकळा संवाद होतोय, मुलांची मते विचारात घेतली जाताहेत, त्यांना निर्णय स्वातंत्र्य दिलं जातंय.अहो बाबा वरून अरे बाबा पर्यंत जवळीक निर्माण झालीये. पण शेवटी पालकत्व ही आई–बाबा दोघांनी एकत्रितपणे निभवायची गोष्ट आहे. फॅमिली ह्या शब्दाचा अर्थच—“फादर अँड मदर, आय लव्ह यू–” असा प्रत्यक्ष जगण्यात यायला हवा. ज्या कुटुंबात पालक आणि पाल्य यांच्यात भावनिकदृष्ट्या स्वच्छ, निर्मळ, निकोप नातं निर्माण होतं त्या कुटुंबात मुलांना शिस्तीचे धडे द्यायची गरज नसते असं मला
तरी वाटतं. “शिस्त आणि प्रेम(मैत्री) ही एकाच तराजूत सामंजस्याने, एकमेकांच्या सहकार्याने तोलून धरायची आणि सावरून धरायची बाब. पालक आणि पाल्य ह्यांच्यातील नातेसंबंध हा जितका नाजूक तितकाच चिंताजनक विषय—“सिंगल मदर किंवा सिंगल फादर” ला हे नातं निभावताना तारेवरची कसरतच करावी लागते. (मूल दत्तक घेणारे किंवा सावत्र म्हटले जाणारे पालक —त्यांच्यासाठी हे नातेसंबंध अजूनच क्लिष्ट होऊन जातात.) लहान मुलांना तर त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगी ,वयाच्या प्रत्येक टप्प्यावर“आई–बाबा” दोघांची उपस्थिती हवीच असते.त्यांचा आपलेपणा हवासा वाटत असतो. मुलं मोठी होत असताना वैयक्तिक समस्यांबाबत, करियरबाबत, मित्र मैत्रिणीबाबत “शेअर” करणं गरजेचं वाटूच शकतं. आणि ह्या शेअरिंग ची सुरुवात बालपणापासूनच होते किंवा व्हायला हवी.
शेवटी— हे नातं सुदृढ, निकोप ठेवणं ही जितकी पालकांची जबाबदारी आहे,तितकीच ती पाल्यांची देखील आहे. ज्याप्रमाणे मुलांच्या अडचणीच्या वेळी पालकांनी एकत्रितपणे जबाबदारी निभावणं हे जसं मुलांना न्याय देणारं आणि त्यांच्या मानसिक गरजा पूर्ण करणारं ठरतं—त्याचप्रमाणे मुलांनीही पालकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर सामंजस्याने विचार करणं अत्यंत जरुरी आहे. “Give your child your presence not your prezents–” हे जसे पालकांना लागू होते तसेच ते मुलांनाही तंतोतंत लागू व्हायला काय हरकत आहे. गरज असतांनाच काय; पण एरवी देखील आई वडिलांची काळजी घेणे, त्यांना मानसिक आधार देणे हे त्यांच्यातील निकोप नात्याचेच चिन्ह मानले जावे.आणि जसे आई–वडील कायद्याने विभक्त झाले असले तरी पालकत्वात त्यांनी एकत्र असायला हवं असं म्हटलं जातं तसंच—मुलं काही कारणांनी आई वडिलांपासून वेगळी रहात असली तरी त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, हेही खरं—–
तात्पर्य, मुलांना शिस्तीचे धडे देण्यासोबतच त्यांच्याशी योग्य त्या वयात, योग्य त्याप्रकारे सुसंवाद साधण्याचा प्रयत्न पालकांनी केला पाहिजे आणि त्याचवेळी मुलांनीही मनमोकळेपणाने पालकांसोबत स्वतःचा आनंद, दुःख ,विचार वाटून घेतलं तर दोघांमधील संबंध ताण–तणावाचे न रहाता आनंददायी, सुखकर होऊ शकतील.
