गणेशोत्सव : बेंगळूरु मधील वास्तव्यातील २ अतिशय आनंदी दिवस…
दिनांक ३० आणि ३१ऑगस्ट या दोन दिवशी महाराष्ट्र मंडळ, बेंगळूरु यांच्या गणेशोत्सवाला उपस्थित राहण्याचा योग जुळून आला. ते दोन दिवस मी आणि माझ्या पत्नीसाठी अतिशय आनंदाचे होते.

आम्हाला जाणवला तो महाराष्ट्र मंडळाच्या प्रत्येक सभासदामध्ये असलेला उत्साह, चेहऱ्यावर असलेला आनंदी भाव आणि दिलखुलास हास्य, त्यांच्यातील असलेला एकोपा (जो समाजात हल्ली अभावानेच आढळतो).
प्रत्येक कार्यक्रमाचे अतिशय उत्तम आयोजन करण्यात आले होते. हे विशेष जाणवले स.न.वि.वि. मासिकाच्या प्रकाशनानंतर झालेल्या सन्मानचिन्ह आणि बक्षिस समारंभ वितरणाच्या कार्यक्रमाच्या वेळी.
साधारण २५-३० व्यक्तींना सन्मानचिन्ह किंवा बक्षिसे देण्यात आली. यामध्ये कुठेही गडबड गोंधळ नव्हता. निवेदक ज्याचे नांव घोषित करत होता, त्याच व्यक्तीच्या नावाची थैली रंगमंचावर येत होती. महाआरतीच्या वेळेला सुध्दा सर्व आरत्या शिस्तबद्ध पद्धतीने गणराया समोर सादर केल्या गेल्या.
मी आणि माझी पत्नी प्रथमच महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवाला हजर रहात होतो. एकाही पदाधिकार्ऱ्याला आम्ही आधी कधी भेटलो नव्हतो, फक्त भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला होता.
पण आम्ही तिथे आल्यानंतर अतिशय प्रसन्नतेने, आगत्याने आमचे स्वागत केले गेले आणि तदनंतर आम्ही कोणीतरी परके आहोत अश्या तऱ्हेने कोणीही आमच्याशी वागले नाही. या सर्वांमुळे आम्ही खूप भारावून गेलो.
या साठी आम्ही राधिका मराठे, दीपक कुलकर्णी, स्मिता बर्वे, सौ. पूजा सोनावणे-जोशी, विशाखा चितळे-परूळेकर आणि इतर सर्व सभासद यांचे आम्ही आभारी आहोत.
आमच्या आयुष्यातले खरोखर ३० आणि ३१ ऑगस्ट हे अतिशय आनंदाच्या दिवसापैकी दोन दिवस होते.
तुमच्या पाठी श्री. गणरायाचे आशीर्वाद आहेतच त्याच बरोबर आमच्यासारख्या असंख्य लोकांच्या सदिच्छा देखील आहेत.
तुम्हां सर्वांबरोबर कायमस्वरूपी हितसंबंध ठेवण्यात आम्हाला नक्कीच आनंद आणि समाधान लाभेल.
पुन्हा एकदा मनापासून आभार!
गिरीश गाडगीळ
